कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रम आरोग्य कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे राबवावा, असे आवाहन उपायुक्त निखिल मोरे यांनी केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी शहरातील स्वच्छतेवर अधिक भर देऊन शहरात उघडयावर कचरा आणि पालापाचोळा जाळला जाणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच रस्यांची दैनदीन स्वच्छता नियमीतपणे करावी आणि धुळीचे कण कमी करण्यासाठी स्वच्छतेवर भर दयावा असे आवाहनही त्यांनी केले. ते राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत मुकादमांच्या कार्यशाळेत बोलत होते.

निखील मोरे म्हणाले की, कोल्हापूर शहरातील हवेची गुणवत्ता स्वास्थ्यपूर्ण रहावी, यासाठी सर्वांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमाअंतर्गत शहरात सफाई आणि स्वच्छतेवर अधिक भर द्यावा. तसेच कोल्हापूर शहर हवा प्रदूषणमुक्त होण्यासाठी शुध्द हवा कार्यक्रमात अधिकाधिक लोकसहभाग वाढवावा.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी मोरे, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे यांनी स्वागत केले. यावेळी माझी वसुंधरा अभियानातंर्गत हरित कायदा पालन शपथ घेण्यात आली. या कार्यशाळेस विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर आदी उपस्थित होते.