कोल्हापूर (प्रतिनिधी) :  श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जोतिबा डोंगर येथे भक्तिमय वातावरणात नगरदिंडी  काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या तालावर, जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात या दिंडीला सुरुवात झाली.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी नगरदिंडीतून जोतिबाचे दर्शन घेतल्यास चारधाम यात्रा केल्याचे पुण्य पदरात पडते, अशी भावना भक्त जनांची आहे. महाराष्ट्राबरोबरच आंध्र, कर्नाटक राज्यातील भाविक या नगरदिंडीत सहभागी झाले होते. सहज सेवा ट्रस्टच्या वतीने गायमुख येथे भाविकांना शाबू खिचडी, केळी, चहाचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे दोन वर्षे नगरदिंडी निघाली नव्हती. यंदा मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

गायमुख येथे दिंडी पोहोचली तेव्हा सहज सेवा ट्रस्टचे सदस्य, पदाधिकारी, स्वयंसेवक यांनी चांगभलच्या जयघोषात स्वागत केले. ३० हजारांहून भाविकांनी खिचडी, केळी याचा लाभ घेतला. दिंडी प्रदक्षिणा पूर्ण करून गायमुख परिसरातील मल्लिकार्जुन मंदिर येथे  आल्यानंतर भाविकांना चहा देण्यात आला.