परळी  (प्रतिनिधी) : परळी मतदारसंघातील पहिल्या गावापासून मला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. माझ्या लग्नाची वरातही इतकी मोठी  नव्हती. भविष्यात अशा वराती बऱ्याच निघणार आहेत,   असे मी बायकोला म्हटले होते. ते आज खरं ठरलं,  अशी मिश्किल टिप्पणी  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (सोमवार) येथे केली.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने जयंत पाटील आज परळीत  आले  होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे जयंत पाटील हे भारावून गेले. आपल्या भाषणात त्यांनी याचा आवर्जून उल्लेख केला.

ते म्हणाले की, परळीत आल्यानंतर कोरोना पूर्ण गेल्याची माझी खात्री झाली आहे.  मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कार्यकर्त्यांच्या असलेल्या प्रेमाबद्दल मी आजवर ऐकले होते. पण आज मी ते माझ्या डोळ्यांनी पाहिले,  प्रत्यक्ष अनुभवले. कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहता पुढच्या दहा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना कोणी हरवू शकणार नाही, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.