इचलकरंजी (प्रतिनिधी) : मलमल कापडाला बाजारपेठेत योग्य भाव नसल्याने यंत्रमागधारकांना  उत्पादन खर्च व विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे व आर्थिक नुकसानाची झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे मलमल कापडास योग्य भाव मिळावा म्हणून सलग आठ दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय आज (शुक्रवार) इचलकरंजी मलमल कापड उत्पादक असोसिएशन बैठकीत एकमताने घेण्यात आला.

बहुसंख्य उत्पादकांनी कापड व्यवसायाबाबत शासनाच्या चुकीचे धोरण असल्याची टीका केली. त्याचप्रमाणे सूत दरवाढ, कामगारांची कमतरता, वाढलेले वीजदर, कापडाचे घसरलेले दर, उत्पादन खर्च वाढ या पार्श्वभूमीवर सर्वांनी सखोल चर्चा केली. शुक्रवार दि. २२ ते २९ जानेवारी या कालावधीत सर्व कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने झाला. या बैठकीत असोसिएशनचे प्रदीप धुत्रे, बाळकृष्ण पोवळे, विजय नाकील यांच्यासह अन्य कारखानदार उपस्थित होते.