कोल्हापूर (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील कणेरी येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. हा  प्रकार आज (गुरूवार) सकाळी उघडकीस आला . कोमल निशिकांत चव्हाण (वय २८, रा. कणेरी, कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर निशिकांत सुरेश चव्हाण (वय ३२, रा. कणेरी) असे खून केलेल्या संशयित पतीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान,  पत्नीचा खून केल्यानंतर पतीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोरी तुटल्याने तो बचावला. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी निशिकांत चव्हाण हा कुटुंबासमवेत एकता कॉलनी येथे दीपक पोवार यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता.  चारित्र्याच्या संशयावरून त्याने बुधवारी रात्री २ च्या सुमारास रागाच्या भरात पत्नी कोमलचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यानेही दोरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने दोरी तुटल्याने तो बचावला. त्यांना ६ आणि २ वर्षाची दोन मुले आहेत.  याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

घटनास्थळी करवीरचे डीवायएसपी आर. आर. पाटील यांच्यासह गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील दाखल झाले असून तपासाला सुरूवात झाली आहे.