पेठवडगाव (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे जमिन आणि घराजवळील असणाऱ्या कुंपणाच्या वादातून युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. अविनाश भगवान कांबळे (वय ३५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून याबाबत पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तळंसदे येथील भगवान सहदेव कांबळे आणि शिवाजी रामू कांबळे या चुलत भावांमध्ये जमिनीचा आणि घराशेजारील कुंपणावरून अनेक वर्षे वाद सुरु होता. आज (गुरुवार) सकाळी कुंपणाच्या कारणावरून दोन्ही कुटुंबामध्ये वाद विकोपाला जाऊन मोठ्या प्रमाणात मारामारी झाली. यामध्ये झालेल्या मारहाणीत अविनाशचा मृत्यू झाला. अविनाश कांबळे यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.