कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीआर येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर तिघा अत्यवस्थ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या सर्व दुर्घटनेची चौंकशी करून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना त्वरित मदत देण्यात यावी. अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आज (सोमवार) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सीपीआरमध्ये काही दिवसापूर्वी ट्रामा केअर सेंटरमधील व्हेण्टीलेटरजवळ स्फोट झाला होता. त्यावेळी या सेंटरमध्ये असणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांना दुसऱ्या विभागात हलविण्यात आले होते. या दुर्घटनेनंतर काही तासातच तिघां कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये विजयकुमार रामचंद्र कांबळे (वय ४५, रा. नागरदळे ता. चंदगड),  बाबासाहेब श्रीपती भोजे (वय ५२, रा. सिध्दार्थनगर, कोल्हापूर), मुक्ताबाई विश्वास पाटील (वय ५०, रा. बानगे ता. कागल) यांचा समावेश आहे.

ही दुर्घटना घडून एक महिना उलटला तरी महाराष्ट्र शासनाने अद्याप या घटनेकडे लक्ष दिलेले नाही. अथवा यांच्या कुटूंबाना आर्थिक मदतही केली नाही. ही घटना निंदनीय असून या घटनेची अजून चौकशी पूर्ण केली नाही. तरी या घटनेची त्वरीत चौकशी होऊन या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या ट्रामा केअर सेंटरमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करुन करावा. तसेच मृत्यूमुखी पडलेल्या कुटूंबियांच्या नातेवाईकांना शासनाकडून भरीव मदत देऊन न्याय मिळावा अशी मागणी उत्तम कांबळे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी मयत विजयकुमार कांबळे यांची पत्नी स्नेहल कांबळे, विनायक कांबळे,  संजय कांबळे, कल्मेश्वर कांबळे, सुभाना कांबळे यांच्यासह आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.