मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा तब्बल ३७२ धावांनी पराभव केला. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुसऱ्या डावात १६७ धावांत गुंडाळले. न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या ६२ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ७ बाद २७६ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. भारताने न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य दिले, पण किवींना हे आव्हान पेलता आले नाही.
या विजयामुळे भारताने ही मालिका १-० अशी जिंकली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत १२ गुणांची कमाई केली. याआधी भारताने २०१५ मध्ये दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३७ धावांनी विजय नोंदवला होता. मयंक अग्रवालला सामनावीर तर रवीचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने कप्तान टॉम लॅथमला ६ धावांवर बाद केले. त्यानंतर अश्विनने विल यंग (२०) आणि रॉस टेलर (६) यांनाही माघारी धाडले. ३ बाद ५५ अशी धावसंख्या असताना डॅरिल मिशेलने खिंड लढवली. त्याला हेन्री निकोल्सने साथ देत संघाचे शतक पूर्ण केले. अक्षर पटेलने ही जोडी फोडली. मिशेलने ७ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा केल्या. यष्टीरक्षक टॉम ब्लंडेल भोपळा न फोडता धावबाद झाला.
१२९ धावांत न्यूझीलंडने ५ फलंदाज गमावले. चौथ्या दिवशी जयंत यादवने रचिन रवींद्रला (१८) पुजाराकरवी झेलबाद करत न्यूझीलंडला सहावा धक्का दिला. त्यानंतर पुढच्या पाच धावांत न्यूझीलंडने आपले चारही फलंदाज गमावले आणि त्यांचा दुसरा डाव ५६.३ षटकात १६७ धावांत संपुष्टात आला. फिरकीपटू जयंत यादव आणि अश्विनने प्रत्येकी ४ बळी घेतले.