कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाची महामारी आणि त्यानंतर आलेला महापुर या काळात वाढलेल्या विजबिल थकबाकीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. महावितरणचे अस्तित्व टिकविण्यासाठी थकीत वीजबिल वसूल करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या अनुषंगाने महावितरणच्या वीज कामगार, अधिकारी संघटनांनी कोल्हापूर परिमंडळातंर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वीज बिल थकबाकी शुन्य करण्याचा निर्धार मुख्य अभियंता परेश भागवत यांच्यासमावेत झालेल्या बैठकीत केला आहे.

या बैठकीत, सद्यस्थितीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सुमारे ८०० कोटी रुपये वीज बिल थकबाकी आहे.  महावितरणला दैनंदिन कारभार व वीज खरेदी करिता नियमित अर्थपुरवठा होणे गरजेचे आहे. दरमहा वीज बिल वसुलीच्या महसुलावरच महावितरणची  भिस्त अवलंबून असल्यामुळे या कठीण काळात १०० टक्के वीज बिल वसुली होणे आवश्यक आहे.  ग्राहकांना अखंडित आणि  सुरळीत वीज पुरवठा देण्याची जबाबदारी महावितरणवर आहे.

तेंव्हा वीज ग्राहकांनाही आपली मासिक वीज देयके नियमित भरणा करून  महावितरणला ही जबाबदारी पेलण्यासाठी आर्थिक पाठबळ  देणे तेवढेच आवश्यक आहे. वीज कामगार संघटनांच्या पुढाकारातून कोल्हापूर परिमंडळ आणि सांगली मंडळ कार्यालयात वीज बिल थकबाकी सद्यस्थिती व वसुलीसाठीचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा  करण्यात आली. तसेच संघटना प्रतिनिधींनी नेहमी वीज बिल थकबाकीमुक्त असणाऱ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुन्हा वीज बिल वसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करून महावितरण कंपनीचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, कार्यकारी अभियंता, संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.