पुणे (प्रतिनिधी) : ‘मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवारसाहेबांनी समजावून सांगावं’ असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लगावला. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीपातींचं राजकारण वाढलं, असा आरोप ठाकरे यांनी केला होता. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत’, असं म्हटलं होतं. यावर आता राज ठाकरे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरे आज (शुक्रवार) पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. ‘वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या, तरी आपली प्रगती होणार नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का? या अनुषंगाने माझी भूमिका होती’, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण १९९९ नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं सांगत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीमुळे जातीयवाद वाढल्याचा पुनरुच्चार केला. मराठा आरक्षण देता येत नसेल तर स्पष्ट सांगा. केवळ तरुणांची माथी भडकवू नका अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.

मी बाबासाहेब पुरंदरेंना भेटतो. ते शिवशाहीर म्हणून भेटतो. ब्राह्मण म्हणून भेटत नाही. शरद पवारांना भेटतो तेव्हा मराठा म्हणून भेटत नाही. तुम्हाला भेटतो तेव्हा तुमची जात पाहून भेटत नाही. आपण यातून बाहेर पडलं पाहिजे, असं सांगत राज ठाकरे यांनी मला कुणी मोजण्याचं काम करू नका, असा टोलाही संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांना लगावला.

नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले, जात-धर्माच्या आधारे नाही. लोक विकासाच्या मुद्द्यावरही मतदान करतात हे दिसलं, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.