कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांची एकत्रित ताकद मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांच्या विजयाची वाट सुकर झाली आहे. तरीही गाफील न राहता उरलेल्या दिवसात जोमाने प्रयत्न करा. या दोन्ही उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन ‘कोल्हापूर दक्षिण’चे आ. ऋतुराज पाटील यांनी केले.

फुलेवाडी रिंग रोड येथील शिक्षक व पदवीधर मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, प्रा. जयंत आसगावकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांची जाण असल्याने ते शिक्षणविषयक व शिक्षकांचे प्रश्न ताक़दीने मांडतील. त्यामुळे त्यांनाच पहिल्या पसंतीचे मत द्यावे. कोल्हापूरमध्ये पडलेल्या ठिणगीचे ज्वालेत रूपांतर होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला

या वेळी सौ. अनु आसगावकर म्हणाल्या की, आसगावकर परिवाराने बहुजनांच्या शिक्षणासाठी जे योगदान दिले आहे, शैक्षणिक आव्हाने परतवून लावणेसाठी जो संघर्ष केला आहे त्याची नोंद घेऊन प्रा. आसगावकर यांना मतदान करून निवडून आणावे, ही विनंती केली.

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न मांडणारा हा त्यांच्यामधीलच असावा, असे मत नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी व्यक्त केले. या प्रसंगी श्री. वसंतराव देशमुख, प्रा. महादेव नरके व उदय पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी प्रास्ताविक, संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन व पी. एस. शिंदे यांनी आभार मानले. या वेळी सविता पाटील, एन. के. चव्हाण, बाजीराव कांबळे, अर्जुन पाटील, डी. डी. पाटील, अमित रजपूत, प्रशांत पोतदार, राजेंद्र तोंदकर, संतराम कांबळे, शिवाजी पाटील, वैशाली पाटील, शारदा पाटील, शिक्षक व पदवीधर मतदार उपस्थित होते.