कागल (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर जनतेच्या सार्वभौम स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे शिवराज्याभिषेक म्हणून ओळखला जाणारा हा दिवस यापुढे ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून  साजरा केला जाईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर केलेल्या शासन निर्णयाबद्दल मुश्रीफ यांचा सत्कार कागल येथील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

ना. मुश्रीफ म्हणाले की, यापुढे सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करूया. या दिवशी ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांवर भगवी गुढी मोठ्या दिमाखात फडकेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, कार्य आणि इतिहास यावर आधारित विविध कार्यक्रमांच्या रूपाने खऱ्या अर्थाने लोकजागर करूया. जनतेचे राज्य कसे चालवावे याचा वस्तुपाठच छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला आहे. शिवरायांनी शेतकऱ्यांची मदत, स्त्रियांचे संरक्षण, पर्यावरणाचे रक्षण, निकोप न्याय व्यवस्थेबरोबरच अपराध्यांना कडक शासन याबद्दल दिलेली आज्ञापत्रे आजही अनुकरणीय आहेत.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले की, या ऐतिहासिक निर्णयाबद्दल लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हा पातळीवर मुश्रीफ यांचा सत्कार आयोजित केला जाईल. माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे म्हणाले, ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय ऐतिहासिक आहे. त्याबद्दल २४ जानेवारी रोजी पुण्यातील ऐतिहासिक लाल महालामध्ये मंत्री मुश्रीफ यांचा मराठा समाजाच्या वतीने सत्कार होणार आहे.

यावेळी सकल मराठा समाजाचे उपाध्यक्ष विशाल पाटील, नितीन काळबर,आनंदराव पसारे, नाना बरकाळे, दीपक मगर, शशिकांत भालबर, महेश मगर, प्रकाश जाधव, विक्रम चव्हाण, संग्राम लाड, अरविंद लाड, सतीश पोवार आदी उपस्थित होते.