मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील महावितरणच्या वीज ग्राहकांना कुठल्याही प्रकारची माफी अथवा सवलत मिळणार नाही, वीज वापरली असेल तर बिल भरावे लागेल असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज (मंगळवार) स्पष्ट केले. यामुळे सर्व थरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. भाजपाने जोरदार टीका तर केलीच, त्याचबरोबर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग ठराव मांडणार असल्याचा इशारा आ. अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

वाढीव वीजबिलात सवलत देणे अशक्य आहे, वीज वापरली असेल तर बिल भरावं लागेल. लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजे. आम्हीही ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत. कामकाज चालवण्याच्या मर्यादा आम्हालाही आहेत. वीज बिल सवलतीचा विषय नाही असं नितीन राऊत यांनी सांगितल्याने वीज बिल कमी होईल या आशेवर असणाऱ्या सर्वसामान्यांना झटका बसला.

यावरूनच आ. अतुल भातखळकर यांनी तीव्र प्रतिक्रिया केली. ते म्हणाले की, वीजबिलात सवलत देणार नाही, वीजबिल भरले नसल्यास तत्काळ वीज खंडित करण्याचे आदेश दिले, हा निव्वळ खोटारडेपणाचा कळस आहे. एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर सरकारला जाग आली होती. आता या बेशरम आणि खोटारड्या सरकारला १००० व्हॉल्टचा शॉक देणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले. तसेच भाजपाने सरकारविरोधात आंदोलन केल्यानंतर वीजबिलात सवलत देऊ असं आश्वासन दिलं, परंतु आज त्यांचा खरा चेहरा समोर आला. सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजपा पुन्हा आंदोलन करेल आणि जनतेला दिलासा देण्यास भाग पाडेल. जनतेची फसवणूक करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग ठराव आणू.