मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. रुग्णसंख्येतील वाढीबरोबरच मृत रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बारावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज (मंगळवार) मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा कधी होणार याची प्रतीक्षा विद्यार्थी, पालकांना लागली होती. काही दिवसांपूर्वी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार, असे सांगितले होते. मात्र या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. बारावीच्या परीक्षा मात्र होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अधिकृत तारीख देण्यात आली नाही आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यास या परीक्षेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे