सांगली (प्रतिनिधी) : ज्या मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातला कोथरूड मतदारसंघ जिवापाड जपला त्यांना बाजूला करुन, आपल्या अधिकाराचा वापर करून चंद्रकांतदादा पाटील यांनी निवडणूक लढवली. आपल्याच पक्षातील महिला नेत्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन निवडणूक जिंकायची, हा पुरुषार्थ आहे का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही. मी काहीच बोललो नाही तरीही माझ्यावर बोलतात अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सांगलीत आज (सोमवार) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आपल्याच पक्षातील महिला आमदाराच्या मतदारसंघात ‘आयत्या बिळावर नागोबा’ सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांवर टीका करणे बंद करावे. विरोधी पक्षात आहात. जे काही आहे त्यावर रितसर बोलायला आमची तक्रार नाही पण चुकीचे बोलणार्‍यांचे इनडायरेक्टली समर्थन करण्याचा स्वभावदेखील बरा नव्हे. चंद्रकांत पाटील यांना पक्ष कसा टिकवायचा याची चिंता पडली आहे. त्यामुळे पाहिजे ते वारेमाप बोलत सुटले आहेत. पुण्यातल्या एका अतिशय चांगले काम करणाऱ्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का ?