इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहरातील डेंग्यू आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करुन साथीच्या आजारावर नियंत्रण आणावे. प्रत्येक भागात घंटागाडी, दैनंदिन कचरा उठाव आदीमध्ये नियमितता ठेवावी. त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही, अशा सक्त सूचना नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांनी आज (बुधवार) आरोग्य विभागाच्या बैठकीत दिल्या.

शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्युचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर शहरात दैनंदिन कचरा उठाव होत नाही. घंटागाडी वेळेत येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या आहेत. याची दखल घेत नगराध्यक्षा स्वामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

सध्या पडत असलेल्या पावसामुळे साथीचे आजार पसरु लागले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने स्वच्छतेच्या कामात हयगय करु नये. प्रत्येक भागात सारण गटारींची स्वच्छता करावी. डेंग्यु अथवा तत्सम आजाराचे रुग्ण आढळून येत असलेल्या भागासह सर्वच ठिकाणी औषध व धूर फवारणीसह स्वच्छता मोहीम राबवावी. प्रत्येक भागात कचरा उठाव करण्यासाठी घंटागाडी नियमित व वेळेत फिरवावी.

या बैठकीत आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक किसन शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, आरोग्य विभाग प्रमुख विश्‍वास हेगडे, मुख्य स्वच्छता निरीक्षक सूर्यकांत चव्हाण, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील आदीसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.