मुंबई (प्रतिनिधी) : मविआ आमदारांना फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू आहे, असा आरोप शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरुपयोग सुरू आहे. आमदारांना धमकावल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. आमच्याकडे या साऱ्या प्रकाराची रेकॉर्डिंग असून, वेळ आल्यावर सर्व पुरावे समोर आणू, असा इशाराही त्यांनी दिला.

पटोले म्हणाले की, या पद्धतीची लोकशाही असू शकत नाही. मतदानाच्या अधिकारापासून वंचित करण्याचे काम ज्या पद्धतीने सुरू आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीन न्याय मिळवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन संरक्षण देण्याची मागणी करतात, याचा अर्थ आपला देश कुठल्या दिशेने चालला आहे, याचा अंदाज सगळ्यांना यायला पाहिजे.

मविआने केले स्टिंग

पटोले म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत आणि आता विधान परिषद निवडणुकीत देखील भाजप तपास यंत्रणाचा वापर करत आहे. विधान परिषद निवडणुकीत आम्ही नक्कीच जिंकू. त्यानंतर मात्र, जनतेसमोर या सर्व क्लिप आणू. महाविकास आघाडीने केंद्रीय तपास यंत्रणांचा आणि भाजपचे स्टिंग ऑपरेशन केल्याचेही त्यांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून आमदारांना धमकीचे फोन येत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही दुजोरा दिला. भाजप फोडाफोडीचे प्रयत्न करणारच. विधान परिषद निवडणुकीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील​ आमदारांवर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे, असा आरोप भुजबळ यांनी केला.

भुजबळ म्हणाले, कोणत्याही निवडणुकीत छोट्या पक्षांचे तसेच अपक्ष आमदारांचे मतदान महत्त्वाचे ठरते. त्यासाठी त्यांना आपल्याकडे खेचण्याचा सर्वच पक्ष प्रयत्न करतात. त्यात तसे काही वाईट नाही. आमच्याकडूनही आमदारांना वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करणे चुकीचे आहे.