गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हसूरचंपू (ता.गडहिंग्लज) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये काजूच्या टरफलापासून तेल काढण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सुमारे १ कोटींचे नुकसान झाले. ही आग आज (गुरुवारी) पहाटे तीनच्या सुमारास लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असून कारखान्यातील कच्च्या मालासह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

औद्योगिक वसाहतीमध्ये काजूच्या टरफलापासून तेल काढण्याचा कारखान्यात मोठ्या प्रमाणात कच्चा माल होता. टरफलाच्या ढिगार्‍यावर विजेची ठिणगी पडून आग लागल्याचा अंदाज आहे. शेजारच्या शेडमध्ये कामगार झोपले होते. आगीमुळे शेडचा पत्रा तापल्याने कामगारांना आग लागल्याचे लक्षात आले. तर दोन जेसीबीच्या सहाय्याने काजू टरफलाची पोती बाजूला काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.