मुंबई  (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे सरकार सहा महिन्यांत जाईल, नंतर वर्षात पडेल, अशी भविष्यवाणी आपण करत होता. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदारांनी भाजपला नाकारले  आहे. त्यामुळे  येत्या चार महिन्यात भाजपचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील,  हे तुम्हाला कळणारही नाही,  असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ते विधानसभेत बोलत होते.

 

पवार पुढे म्हणाले की, तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झाल्यामुळे भाजपचा  हातातोंडाशी आलेला घास गेला. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे  येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या, मी आधीच का सांगितले नाही, असे म्हणू नका.

नागपूरची जागा भाजपने गमावली. त्याचा एका गटाला प्रचंड आनंद झाला,  मात्र दुसरा गट अस्वस्थ झाला. पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाच पराभव झाला. धुळे-नंदुरबारमध्ये अमरीश पटेल जरी निवडून आले असले तरी, ते आमच्याकडूनच तिकडे गेलेले आहेत. ते कधी परत येतील, हे कळणार नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.