वर्धा  (प्रतिनिधी) :  भाजपचे अनेक बडे नेते  महाविकास आघाडीच्या म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यांना लवकरच पक्षात प्रवेश देण्यात येणार आहे, असा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ते वर्ध्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देशमुख यांनी म्हटले आहे की, भाजपचे नेते केवळ राष्ट्रवादीच्याच नव्हे, तर काँग्रेस आणि शिवसेनेच्याही संपर्कात आहेत. त्यामुळे पुढील काळात पुण्यात जसा पक्षप्रवेश झाला, त्या पध्दतीने  या नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यापैकी ज्या पक्षात ज्या भाजप नेत्यांना जायचे आहे, त्या नेत्यांना प्रवेश दिला जाईल.  रिपब्लिक टीव्हीचे संपादक  अर्णव  गोस्वामी यांच्या व्हॉट्सअप चॅट प्रकरणी काय पावले उचलता येतील ? याबाबत कायदेशीर सल्ला मागितला आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.