हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील गाई आणि बैलांना लम्पी या संसर्गजन्य रोगाने ग्रासले आहे. मोठ्या प्रमाणात पाळीव दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडत असल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान आणि मानसिक खच्चीकरण होऊन शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. जिल्हा प्रशासनाने लसीकरण आणि उपचार चालू ठेवले आहेत. तरीही शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
अतिग्रे आणि हातकणंगले येथील जनावरांच्या गोठ्यावर दलित मित्र, जि प. चे माजी सदस्य अशोकराव माने, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष भगवान काटे, तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेऊन आर्थिक पाठबळ देण्याबरोबर लसीकरण, सत्त्वयुक्त खाद्य देण्यासाठी गावोगावी शिबिर आयोजित केली जात आहेत. या बाबत संबंधित शेतकऱ्यांना मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या वेळी संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करून हा रोग आटोक्यात आणावा अशी मागणी केली आहे.