कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊसतोडणी मुकादम साखर कारखाने आणि वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करीत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवून साखर कारखाने आणि वाहतूकदारांची लुबाडणूक थांबवा. अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी नागपूर अधिवेशनामध्ये केली.      

आ. मुश्रीफ म्हणाले, कोयत्यांच्या संख्येवर मुकादम मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स घेतो. ही रक्कम तो मजुरांनाही देत नाही. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या वाहतूकदारांना तर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अनेक साखर कारखान्यांची कोट्यावधींची बाकी राहिली आहे. त्यांच्या जिल्ह्यात मुकादमांचे संघटन असल्यामुळे कारखान्यांचे ते काहीही चालू देत नाहीत. त्याउलट त्यांच्या टोळीतला एखादा कामगार आणला तर त्याच्यावरच ते गुन्हा दाखल करतात.

तसेच, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत ऊसतोड मजुरांची आणि मुकादमांची नोंदणी झाली पाहिजे. त्यासाठी टनाला दहा रुपये कपात केले जातात. महामंडळाच्या माध्यमातून ऊस तोडणी मजुरांना सवलती द्या. कारण कोट्यावधींची लुबाडणूक करून मुकादम गब्बर झाल्याचे ते म्हणाले.

याला उत्तर देताना सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले, आमदार मुश्रीफ यांनी मांडलेली ही परिस्थिती वास्तववादी आहे. मुकादम एका कारखान्याची ॲडव्हान्स बुडवून दुसऱ्या कारखान्याकडे जातो. तिथेही अर्धे काम करून तिसऱ्याच कारखान्याकडे जातो. या संदर्भात लगेच बैठक लावणार आहोत. ऊस तोडणी कामगार हे महामंडळामार्फतच पुरवले जातील. यामुळे कुणाचीही फसवणूक होणार नसल्याचे सांगितले.