कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महा-रेशीम अभियानाला आज (सोमवार) प्रारंभ झाला. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात या अभियानाच्या रेशीम रथाला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हिरवा बावटा दाखवून आज सुरुवात करण्यात आली.

महा-रेशीम अभियानांतर्गत आजपासून १५ फेब्रुवारीअखेर आयोजित केलेला महा-रेशीम अभियान रथ गडहिंग्लज समूहांतर्गत सरोळी, कुमरी, कानडेवाडी, कळीवडे, मुरकुटेवाडी, करवीर समूहांतर्गत म्हाळुंगी, कोतोली, पुनाळ, राधानगरी, कोथळी, पणोरी व हातकणंगले समूहांतर्गत यळगूड, लक्ष्मीवाडी, वाळवे खुर्द, सोनाळी, तळसंदे, व्हनाळी या गावात फिरवण्यात येणार आहे.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रकल्प अधिकारी बी. एम. खंडागळे, जिल्हा मनरेगा समन्वयक संजय पवार, तांत्रिक सहाय्यक तानाजी शिर्के, वाय. ए. पाटील, शेतकरी तानाजी पाटील उपस्थित होते.

रथामार्फत या कालावधीमध्ये ऑनलाईन नोंदणी होणार असल्याने लाभार्थींनी परिपूर्ण कागदपत्रांसह नोंदणी करावी. नंतर ऑनलाईन नोंदणी बंद होणार असल्याने अभियान कालावधीत जे नोंदणी करतील असे लाभार्थी सन २०२१-२२ सालाकरिता मनरेगा योजनेंतर्गत शासनाच्या निकषानुसार पात्र राहतील. अधिक माहितीसाठी रेशीम विकास अधिकारी श्रेणी-२, जिल्हा रेशीम कार्यालय, ५६४ ई-वॉर्ड, व्यापारी पेठ, शाहूपुरी, कोल्हापूर (दूरध्वनी क्र. ०२३१-२६६६६८२) येथे संपर्क करावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे.