कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिल्लीच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास करण्यासाठी आम आदमी पार्टी कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्याची तयारी म्हणून बिंदू चौकातून रिक्षा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, हा प्रचाराचा शुभारंभ नसून विकासाचा शुभारंभ आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता ‘आप’ला १०० टक्के कौल देईल, असा विश्वास ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी व्यक्त केला आहे. बिंदू चौकात स्वच्छता मोहीम राबवून ‘आप’च्या रिक्षा प्रचाराची सुरुवात आज (गुरूवार) करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

दिल्लीच्या निवडणुकांमध्ये रिक्षा चालकांनी आम आदमी पार्टीची साथ दिली, कोल्हापुरात देखील सामान्यांचा आवाज बनलेल्या आम आदमी पार्टीला रिक्षा चालकांचा पाठिंबा लाभत आहे. रिक्षा प्रचारात रिक्षा चालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, असे संदीप देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने तयारीला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शहरातील मतदारांसोबत  ‘मिसळ पे चर्चा’ हा संवाद कार्यक्रम गेला महिनाभर सुरू आहे, तसेच बाजारपेठांमध्ये फिरून छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांकडून देणगी स्वीकारत ‘लोकवर्गणीतून महापालिका निवडणूक’ यासारखे उपक्रम ‘आप’कडून राबिवले जात आहेत. यातच आता रिक्षा प्रचाराचा शुभारंभ करून पार्टीचा प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.

यावेळी उत्तम पाटील, अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, राज कोरगावकर, वैशाली कदम, अभिजित भोसले, राकेश गायकवाड, बसवराज हदीमनी, रविराज पाटील, महेश घोलपे, इलाही शेख, आनंदराव वणीरे, बाबुराव बाजरी, रमेश गावडे, कृष्णात सूर्यवंशी आदी उपस्थित होते.