धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कोनोली पैकी कुपलेवाडी येथे बावीस जुलैच्या रात्री भूस्खलन होवून डोंगर खचून भूस्खल्लन झाल्याने  यामध्ये वसंत लहू कुपले आणि त्यांच्या पत्नी सुसाबाई वसंत कुपले हे दांपत्य झोपलेल्या ठिकाणीच मातीच्या भराव्याखाली गाडले गेले. त्यातच  त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा सतिश लहू कुपले हा बाहेरगावी असल्याने तो या संकटातून वाचला.

या घटनेनंतर निराधार झालेल्या सतिशला आधार देण्यासाठी परीसरातील नागरीकांनी तसेच राधानगरी तालुका आणि जिल्हा पातळीवरील राजकीय नेत्यांनी कुपलेवाडी गावात भेट देऊन आधार दिला. कांही दानशूर व्यक्तींनी त्याला थोडीफार मदत केली. तर बऱ्याच मंडळींनी पाठीवर हात ठेवून सांत्वन केले. पण पाठीवरती हात ठेवून लढ म्हणण्याबरोबरच सतीशला यावेळी खरी गरज आहे ती आर्थिक मदतीची.

येथील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार यांनी लोक प्रतिनिधी म्हणून शासकीय स्तरावरील सर्व मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सामाजिक संस्था आणि ट्रस्ट यांनीही पुढे येवून मदतीचा एक हात पुढे करणे आवश्यक आहे. तरच एका निराधाराला आधार मिळून जगण्याची एक नवी उमेद प्राप्त होणार आहे.