जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील तलाठी आणि कोतवाल यांना उताऱ्यावरील बोजाचे नाव कमी करण्यासाठी अवघ्या २४० रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील एका शेतकऱ्याला आपल्या उताऱ्यावरील बोजा कमी करायचा होता. यासाठी तलाठी प्रविण श्रीकृष्ण मेश्राम (वय-४१. व्यवसाय- तलाठी कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ जि. जळगाव) व कोतवाल प्रकाश दामू अहीर (वय-४५. कोतवाल तलाठी कार्यालय कुऱ्हे पानाचे रा.अंबिका नगर कुऱ्हे पानाचे ता.भुसावळ जि.जळगाव) यांनी शेतकऱ्याकडे लाच मागितली. याबाबत तडजोड होऊन २४० रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, संबंधीत शेतकऱ्याने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. पथकाने आज दुपारी एकच्या सुमारास तलाठी प्रवीण मेश्राम व कोतवाल प्रकाश अहिरे यांना २४० रूपये स्वीकारताना अटक केली.