कोल्हापुर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल यांची  लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता संजयसिंह चव्हाण हे जिल्हा परिषदेचे नवे सीईओ म्हणून काम पाहणार आहेत. 

कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील डॉ. मित्तल यांचा काही महिन्यांपूर्वीच कालावधी संपला होता. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी निवड होणार असेही मधल्या काळात अफवा पसरल्या होत्या. पण डॉ. मित्तल यांची लातूरच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात अतिशय चांगले काम करून जनतेमध्ये विश्वास तर निर्माण केलाच, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासकामे करून स्वतःचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आलेले संजयसिंह चव्हाण हे मूळचे  भोळी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील आहेत. चव्हाण हे कायद्याचे पदवीधर असून एमपीएससीद्वारे १९९३ साली उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. या अगोदर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज आणि इचलकरंजी येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे.