कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंगोलीतील राज्य राखीव दलातील एका जवानाने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली आहे. सुनील भिमराव जाधव (३५, बक्कल न.१०५४, रा. कोल्हापूर) असे त्या जवानाचे नाव असल्याचे राखीव दलाच्या सुत्रांनी सांगितले. पण, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही.

राखीव दलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवान जाधव हे त्यांची पत्नी आणि लहान मुलासोबत राज्य राखीव दलाच्या वसाहतीमध्ये राहत होते. आज पहाटे त्यांच्या पत्नीला जाग आल्यानंतर त्यांना सुनील यांचा मृतदेह हॉलमधील पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकाराची माहिती राखीव दलाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती हिंगोली शहर पोलिस ठाण्यालाही देण्यात आली. मयत जवान जाधव हे मुळचे कोल्हापूरचे आहेत. हिंगोलीच्या राज्य राखीव दलात ते २००६ मध्ये भरती झाले होते.