कोल्हापूर (प्रतिनिधी) : व्यापाऱ्यांनी मास्क घातला नसेल तर ग्राहकांनी वस्तू घेवू नयेत आणि ग्राहकांनी मास्क घातला नसेल तर व्यापाऱ्यांनीही वस्तू देवू नयेत, अशी भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई केले.
व्यापारी असोशिएशनसोबत व्हीडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.  

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कारखानदार, व्यापारी यांनीही दर्शनी भागात मास्क नसेल तर प्रवेश नाही या संदेशाचा फलक लावावा. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. व्यापाऱ्यांनी मास्क लावला नसेल तर ग्राहकांनीही त्यांच्याकडून वस्तू घेणे टाळावे. कर्मचाऱ्यांनीही दुकानात, प्रवेश करु नये. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून सामाजिक अंतराचे पालन होत नसल्यास, व्यापाऱ्यांनीही त्यांना वस्तू वितरण करु नये. फेरीवाले, किरकोळ, फळविक्रेते, दूध, मटण विक्रेते या सर्वांनीही या मोहीमेत सहभागी होवून आपले योगदान द्यावे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझेशन करणे या साध्या उपायांनी कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वजण रोखू शकतो. वेळीच तपासणी करुन अहवाल आल्यानंतर त्वरित उपचार करता येतील. त्यामुळे संभाव्य धोका टाळता येतो. सर्व कारखानदार, व्यापारी, किरकोळ विक्रेते संघटनांनी याबाबत प्रबोधन आणि काटेकोर अंमलबजावणी करावी. मास्क घातल्या शिवाय प्रवेश दिला जाणार नाही, याची कडक अंमलबजावणी करावी.’
महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, ‘सर्वांना मास्क घालण्यास प्रवृत्त करा. मास्कच आपल्याला संसर्गापासून रोखू शकणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने कोव्हिड काळजी केंद्रामध्ये फळ, मास्क, हँन्डग्लोज, सॅनिटाझर याचे दानशुरांनी वाटप करावे. घरगुती वापरासाठी ऑक्सिजन जनरेटरही देण्यास हरकत नाही.’

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेट्टे, खजिनदार हरी पटेल, कार्यकारी संचालक ललित गांधी, अजित कोठारी, अतुल पाटील, गोविंद माने, रणजित शहा, संदीप वीर, कुलदीप गायकवाड, रघुनाथ कांबळे आदींनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.