कोल्हापूर (प्रतिनिधी) : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे पदवीधरमध्ये भाजपकडून सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख तर राष्ट्रवादीचे अरुण लाड महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने लढत चुरशीने होणार आहे. पण पाच जिल्ह्याच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदार कोल्हापूर जिल्हयात असल्याने विजयी उमेदवारासाठी हा जिल्हा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा असे पाच जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यांतून उमेदवाराला संपर्क ठेऊन प्रचार यंत्रणा राबवावी लागते. या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांनी अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे.यामुळे भाजपचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे.पण अलिकडे अनेक राजकीय संदर्भ बदलले आहेत. परिणामी महाविकास आघाडीही जोरदार प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार लाड यांनी यापूर्वी पदवीधरची निवडणूक लढवली आहे. देशमुख यांनी सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले आहेत. हे दोन्ही उमेदवार तोडीस तोड आहेत. म्हणून व्यापक प्रचार यंत्रणा राबवून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नेतेमंडळी प्रयत्नशील आहेत.

पाच जिल्ह्यात सर्वात जास्त कोल्हापूर जिल्ह्यात मतदार आहेत. यामुळे दोन्ही उमेदवारांनी या जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मतदानाची टक्केवारी चांगली झाली तर हा जिल्हाच विजयात निर्णायक भूमिका बजावणार आहे. पाच जिल्ह्यात एकूण ४ लाख ७८ हजार ५४६ मतदार आहेत. जिल्हानिहाय मतदार असे : पुणे ७८१९६, सातारा ६०५७२, सांगली ८५७४१, कोल्हापूर १७०९३३ आणि सोलापूर ८३०९६ असे आहेत.