मुंबई (प्रतिनिधी) : कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसत आहे.  इंदोरीकर महाजारांनी आपल्या कीर्तनात वादग्रस्त विधान केलं होत. याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने न्यायालयात धाव घेतली होती. संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना खटला रद्द करत दिलासा दिला होता.

जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या रंजना गवांदे यांनी यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. आता राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात आपील दाखल केलं आहे. इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात ‘सम तिथीला स्त्रीसंग झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असे वक्तव्य केलं होते. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठा गदारोळ झाला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकारतर्फे २२ जुलैला आपील दाखल करण्यात आलं आहे. त्यावर पुढील प्रक्रिया सुरू असून सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

या प्रकरणातील सरकारतर्फे फिर्याद दिलेले संगमनेरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर भवर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे आपील दाखल करण्यासंबंधीचा निर्णय होण्यास वेळ लागला. अखेर नवीन अधिकाऱ्यांमार्फत हे आपील दाखल झालं आहे. यातील मूळ तक्रारदार अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या रंजना गवांदे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर २ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. सरकारतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.