कोल्हापूर (प्रतिनिधी) : भविष्यात महामार्गावर पुराचे पाणी येणार नाही, याची दक्षता घ्या. राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची कामे करताना नदीच्या पाण्याला अडथळा न येता पाणी वाहते राहण्यासाठी भराव काढून कमानी करा व रस्त्यांची उंची वाढवा, अशा सूचना कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, खासदार व लोकप्रतिनिधींनी केल्या.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कागल ते पेठ नाका आणि पेठ नाका ते शेंद्रे या प्रस्तावित सहापदरी प्रकल्पाच्या कामाबाबत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याची संयुक्त बैठक आज शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यात 2019 व 2019 च्या पूर परिस्थितीमुळे महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक मार्ग बंद राहिले. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली व मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यादृष्टीने महामार्गांचे प्रकल्प बनवावेत, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. तसेच कोल्हापूर शहर प्रवेशद्वारा नजीक शिरोली ते मार्केटयार्ड पर्यंत शहरात येण्यासाठी नवीन उड्डाणपूल करण्यात येत आहे. यामुळे पूरपरिस्थितीतही शहरात प्रवेश करणे शक्य होईल. तावडे हॉटेल चौकानजीक पंचगंगा नदी ते सांगली फाट्यापर्यंत पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी नवीन ’13 बॉक्सेस कलवर्ट्स’ची तरतूद करण्यात आली आहे.यामुळे पुराच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील मंत्री महोदय, खासदार व आमदार यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून महामार्गाच्या प्रस्तावित कामांमध्ये दुरुस्ती करावी. तसेच करण्यात येणाऱ्या दुरुस्ती बाबत माहिती द्यावी. हे कामे गतीने सुरू करावे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी केल्या.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कागल एमआयडीसी (लक्ष्मी टेकडी) येथे 95 मीटर लांबीचा नवीन उड्डाणपूल करण्यात येत असून कागल एसटी स्टँड समोर एसटी बसेस ना सहजपणे ये-जा करण्याच्या दृष्टीने नवीन उड्डाणपूल तयार करावा.

साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, गावांमधून जाणाऱ्या दोन लेनमधील अंतर कमी ठेवावे, महामार्गावरील खड्ड्यांमुळे तसेच साचलेले पाणी उडून अपघात होवू नये याची दक्षता घ्यावी.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महामार्गाखालील भुयारी मार्गावर पाणी साचून नागरिकांची गैरसोय होवू नये, याची दक्षता घ्यावी. महामार्गाशी संबंधित विविध कामांच्या दृष्टीने नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया, जलसंधारण विभाग व महसूल विभागाची संयुक्त बैठक घ्यावी.

सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, पुराच्या पाण्यामुळे दरवर्षी होणारी हानी टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पुराच्या पाण्याला अडथळा येऊ नये, यासाठी पुलांचे रुंदीकरण करणे, पुलाखालील भराव काढून कमानी करणे आवश्यक आहे. नदीचे पाणी निरंतर वाहत राहील व पाण्याला अडथळा येऊन पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी महामार्गांची कामे करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

एनएचएआय चे मुख्य महाप्रबंधक व क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची माहिती दिली. ते  म्हणाले, मान्यवरांनी बैठकीत केलेल्या सूचनांचा विचार करून शक्य ते बदल करून काम सुरू करण्यात येईल.

यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील, खा. संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले छत्रपती, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आ. राजूबाबा आवळे, चंद्रकांत जाधव, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.