कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहीद ऋषीकेशची बहीण कल्याणीला शिवाजी विद्यापीठाच्या शहीद स्फूर्ती केंद्रामार्फत सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. तसेच कृषी महाविद्यालयाने कल्याणीच्या यापुढील शिक्षणाची जबाबदारी घेऊन याच संस्थेमध्ये नोकरी देण्याची ग्वाही दिली आहे. याबाबतचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोंधळे कुटुंबीयांना दिले.

आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांची मंत्री उदय सामंत यांनी आज (मंगळवार) भेट घेवून सात्वंन केले.

यावेळी सामंत म्हणाले की, जोंधळे कुटुंबीयांसह संपूर्ण गाव शोकसागरात बुडालेले आहे. बहिरेवाडीसारख्या छोट्याशा गावातील ऋषीकेशसारखा एक उदयोन्मुख राष्ट्रीय खेळाडू व जवानाला भारतमातेचे संरक्षण करताना वीरगती प्राप्त झाली. एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे जोंधळे कुटुंबीयांवर आकाश कोसळले असून त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव  विलास नांदिवडेकर, विजय देवणे, मुरलीधर जाधव, गडहिंग्लजचे उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, रोशन बी समंजी कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष रिआजभाई समंजी,  बहिरेवाडीचे सरपंच अनिल चव्हाण, उपसरपंच सुरेश खोत आदी उपस्थित होते.