मुंबई ( प्रतिनिधी) : मुंबईतील मेट्रो कारशेडवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविववारी जनतेशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. तर कारशेडवर तोडगा काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन पंतप्रधान मोदींना भेटण्याचा सल्ला दिला आहे.

टीम इंडिया असे समजून काम करा उद्धवजी… आताही वेळ आहे. आरे कारशेडच्या प्रश्नांवर उद्धवजी यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करेत. पण मी राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे ८०  टक्के काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले आहे.

जर तुमच्या उपाययोजना वेगळ्या आणि मुंबईच्या हितासाठी असत्या आणि त्यासाठी तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधानांकडे निवेदन दिले असते. तुमच्याकडे प्रारंभी वेळ होता की, तुम्ही देवेंद्रजींना सोबत घेऊन सर्व तज्ज्ञांच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकला असता. पण आजही मेट्रो कारशेडवर तुमचे सर्व निवेदन अपूर्ण आहे.

दरम्यान, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मोदीजी आणि केंद्राच्या इतर विभागातील मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढून मुंबईच्या हिताचा निर्णय घेऊ शकता. एक जनप्रतिनिधी आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हाच माझा तुम्हाला सल्ला आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.