कुडाळ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीने १९९९ पासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू केले. शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. मात्र, त्यांनी काही टोळ्या निर्माण केल्या आहेत. त्यांचा वापर करून मराठा व इतर समाजात फूट पाडली जाते. नंतर दोन्ही समाज आपल्या खिशात घालायचे, असे पवार यांचे राजकारण आहे, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
पक्षबांधणीसाठी राज ठाकरे आज (गुरुवार) सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसनेच आपल्या फायद्यासाठी मराठा व इतर समाजात फूट पाडली.
राज ठाकरे म्हणाले, सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्य तसेच चित्रपटातील शिवइतिहासाबाबत वाद सुरू आहेत; मात्र हे वाद जाणूनबुजून निर्माण केले जात असून, याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात असे जातीय वाद होत नव्हते किंवा फार कमी प्रमाणात होत होते. तेव्हा काय माणसे इतिहास वाचत नव्हती का? आता सगळेजण वाचायला लागलेत का? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला आजपासून सिंधुदुर्गातून सुरुवात झाली. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे संवाद साधणार आहेत. यावेळी बाळा नांदगावकर,अमित ठाकरेंसह मनसे नेते उपस्थित आहेत. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे कोकण दौऱ्यावर असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटी घेतली.
समान नागरी कायद्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहेत. यावर समान नागरी कायदा एका राज्यासाठी करता येत नसल्याचा दावा करून राज ठाकरे म्हणाले, समान नागरी कायदा एका राज्यात नाही. तर संपूर्ण देशात आणला जातो.
इतिहासाकडे जातीमधून काही लोक पाहत आहेत. तो त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. वेड्यात वीर दौडले सात याबाबत जयसिंग पवारांसोबत बोललो. जगात कोणत्याही इतिहासाच्या पानात कुठेही सात होते की आठ होते याचा कुठेही दाखल नाही. जयसिंग पवार सुद्धा हेच म्हणाले. शिवरायांना धक्का लावणारा मायेचा पूत अजून जन्माला यायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जातीपातीचे राजकारण वाढलं आहे. जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे आहे. उद्धव ठाकरे घराबाहेर पडले असतील तर मला पोटात गोळा येण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी यावेळी दिले.