मुंबई (प्रतिनिधी) : मागील अनेक दिवसांपासून लॉकडाऊनचे चटके सोसत असणाऱ्या जनतेची आणि व्यापाऱ्यांची राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधातून सुटका होण्याची शक्यता मावळली आहे. राज्यातल्या कोरोना नियमांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नसल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. आज (बुधवार)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाल्यानंतर टोपे यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.  

शासकीय सेवेतील डॉक्टरांच्या निवृत्तीचं वय २ वर्षांनी वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून डॉक्टरांच्या निवृत्तीचं वय ६२ पर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे. आठ  दिवसात डॉक्टरांच्या ८९९  जागा भरण्यात आल्या असून पुढील काही दिवसात १ हजार नियुक्त्या केल्या जाणार आहेत. राज्यातील ९२ टक्के रुग्ण १० जिल्ह्यात असून उरलेल्या २६ जिल्ह्यात ८ टक्के रुग्ण असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. मागील महिन्यात ७ ते ८ हजारच्या घरात रुग्ण दररोज वाढले, पण देशाच्या तुलनेत वाढीचा वेग देशाच्या कमी आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यभरात व्यापारी वर्ग कोरोना निर्बंधांविरोधात आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांबाबत काही सकारात्मक निर्णय होऊ शकतो, अशीही एक शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, निर्बंधांमध्ये कोणतीही सूट देण्याचा निर्णय आज झालेला नाही, मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. शाळा सुरु होण्याबाबत जो प्रोटोकॉल लागतो, तो तयार नाही, त्यामुळे शाळा लगेच सुरु होतील अशी सध्या शक्यता दिसत नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.