मुंबई (वृत्तसंस्था) : दहीहंडी साजरी केल्यास जास्त मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे, असा इशारा टास्क फोर्सने दिला आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये दहीहंडी साजरी करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत आज (सोमवार) झालेल्या बैठकीत सांगितले. 

यंदा छोट्या प्रमाणात जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी देण्याची मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली होती. तसेच सर्व गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल, असे या बैठकीमध्ये समन्वय समितीने सरकारला सांगितले होते. परंतु दहीहंडी साजरी केल्याने जास्त मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव वाढू शकतो, असे टास्क फोर्सने सांगितले असल्याची माहिती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी का देऊ शकत नाही, हे समन्वय समितीच्या सदस्यांना समजावून सांगितले.

एकदा परवानगी दिली आणि प्रभाव वाढला, तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल. यावेळी तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, परवानगी नसल्याने आम्ही दहीहंडीचे आयोजन न करण्याची भूमिका घेणार आहोत, असे समन्वय समितीने म्हटले आहे.