कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील पूरग्रस्तांना नुकसानाची योग्य तितकी भरपाई येत्या दोन आठवड्यात विमा कंपन्यांनी द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व विमा कंपनीच्या प्रतिनिधीना आज (गुरुवार) दिल्या. आ. चंद्रकांत जाधव यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विमा कंपनीच्या प्रतिनिधीची बैठक घेतली.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, सर्व विमा कंपन्यांनी इतर जिल्ह्यातून सर्वे करणारे बोलवून घ्यावेत आणि पूरग्रस्तांचे तात्काळ पंचनामे पूर्ण करावेत. व्यापाऱ्यांनी स्वतः फोटो काढले असतील, व्हिडीओ केले असतील तर ते ग्राह्य धरावेत. अवास्तव कोणतीही कारणे देऊन टाळाटाळ न करता सर्व नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.

आ. जाधव म्हणाले की, विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यात कोणताही वाद असेल तर तो सोडवण्यासाठी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा. ज्या विमा कंपनी त्वरित नुकसान भरपाई देते  त्यांच्याकडून यापुढे विमा घ्यावा. सर्व विमाधारकांना कंपनीने मॅसेज पाठवून सूचना द्याव्यात. सर्वेरकडून तात्काळ रिपोर्ट घ्यावेत. जे सर्वेर रिपोर्ट द्यायला विलंब करतील, त्यांचे परवाने रद्द करावेत. अशा सुचना आ. जाधव यांनी दिल्या.

यावेळी संजय शेटे, शिवाजी पोवार, संजय पाटील, धनंजय दुग्गे, हरिभाई पटेल, ललित गांधी, अजित कोठारी आदी उपस्थित होते.