मुंबई (प्रतिनिधी) :  राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे. शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले जात आहे. सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याविरोधात आता येत्या १७ तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली.

राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये मोर्चाचा हा निर्णय घेण्यात आला. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘राज्यात अस्तित्वात आलेल्या बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता धुळीस मिळत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडे जात आहेत.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गावांवर दावा केला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान धुळीस मिळत आहे. गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवली. पुढच्या वर्षी कर्नाटकची निवडणूक असल्याने राज्यातील उद्योग आता कर्नाटकला जाणार का? या सगळ्यावरून राज्यात मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न पडतोय, असे ते म्हणाले.

येत्या १७ तारखेला अतिभव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा अपमान होत असल्याने आता महाराष्ट्राच्या शक्तीचे विराट दर्शन दाखवले पाहिजे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात येणार असून, त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. हा केवळ राजकीय विषय नाही, तर राज्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.