टोप (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील शिये गावातील हनुमाननगर मधील सर्व्हे नंबर २८३ मधील घरे नियमित करण्यासाठी प्रशासनाला सूचना देऊ, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी अभिजित पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले. 

या निवेदनात म्हटले आहे की, करवीर तालुक्यातील शिये गावातील हनुमाननगर २८३ सर्व्हे नंबरमध्ये १९६३ सालापासून सुमारे दोनशे कुटुंबांनी आपली घरे बांधली आहेत. ही कुटुंबे गेली साठ वर्षे या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांची घरे नियमित करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. तसेच शर्थभंग असलेली घरेही शासन निर्णयानुसार दंड भरून नियमित करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रांताधिकारी यांना दिल्या आहेत.