नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतातील नागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य कमी होत आले आहे. भारतामधील स्वातंत्र्याचा स्तर आता पूर्णपणे स्वतंत्र वरुन अंशत: स्वतंत्रवर आणण्यात आला आहे, अशी माहिती अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये असणाऱ्या फ्रीडम हाऊसने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालातून समोर आली आहे.

मुस्लिमांवर होणारे हल्ले, देशद्रोहाच्या कायद्याचा होणारा वापर, सरकारने कोरोना परिस्थिती हाताळताना केलेला लॉकडाऊन, याचा विचार करता भारतातील स्वातंत्र्यावर गदा आली आहे. स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताला दिलेले गुण ७१ वरुन ६७ केले आहेत. जगातील २११ देशांमध्ये भारताचा क्रमांक ८८ वा आहे. यापूर्वी भारत या यादीमध्ये ८३ व्या स्थानावर होता. म्हणजेच भारताची पाच स्थानांनी घसरण झाली आहे. मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी सरकारने मानवी हक्कासांठी लढणाऱ्या संस्थावर दबाव टाकला. वेगवगेळ्या विषयांचे जाणकार आणि पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार घडले. कट्टरतावाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले. यामध्ये झुंडबळी आणि मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्याचाही समावेश आहे. स्वतंत्र देशांच्या यादीमध्ये २०१९ साली मोदी पुन्हा निवडून आल्यानंतर भारताची आणखी घसरण झाली. त्यानंतर २०२० मध्ये भारत सरकारने कोरोनाची परिस्थिती हाताळताना मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.