मुंबई (प्रतिनिधी) : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची आज (शुक्रवार) घोषणा करण्यात आली. अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले असून चेतेश्वर पुजाराकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विराट कोहलीला पहिल्या तर रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. 

कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली कर्णधार असेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांना न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. वृद्धिमान साहा यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल, तर केएस भरत या मालिकेतील दुसरा यष्टीरक्षक असेल.

२८ वर्षीय भरत आंध्र प्रदेशचा असून आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला आहे. यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो पाच स्टँडबाय खेळाडूंपैकी एक होता.