लीड्स ( वृत्तसंस्था) : लॉर्ड्सवरच्या विजयाची लय लीड्स येथील तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला कायम राखता आली नाही. चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचा दुसरा डाव २७८ धावांवर गुंडाळला. आणि इंग्लंडने या कसोटीत एक डाव आणि ७६ धावांनी भारताचा दारूण पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
शुक्रवारी दिवसाअखेर पुजारा शतकाच्या जवळ होता. पण त्याला आज शतकाने हुलकावणी दिली. तर अर्धशतक करून विराट कोहली लवकर तंबूत परतला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने ६५ धावांत ५ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. २ बाद २१५ वरुन पुढे खेळणाऱ्या भारताने आज एका सत्रात उर्वरित ८ विकेट्स गमावल्या. अखेर भारताचा डाव २७८ धावांवर आटोपला. या सामन्यात भारताकडून पुजारा यांने १५ चौकारांसह ९१ धावांची खेळी केली.