मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजप यांची युती होणार असल्याची चर्चा अधूनमधून सुरू असते. यावर दोन्ही पक्षांकडून कोणतेही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. अखेर याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे. जोपर्यंत मनसे परप्रातीयांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही, असे पाटील स्पष्ट केले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकात पाटील म्हणाले, जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. तोपर्यंत मनसे आणि भाजपची युती होणार नाही. याचा अर्थ काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका, असे आम्ही म्हटलेले नाही. स्थानिक लोकांना ८० टक्के नोकऱ्या द्या, असा कायदाच आहे. त्यामुळे यावरून नव्याने भांडण होण्याचे कारण नाही. देशातील सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत. जबलपूर, इंदौर सारख्या शहरात लाख लाख मराठी आहेत. अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणे, तोही संघर्ष करणे आम्हाला मान्य नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष असल्याने या मुद्दयांवर मनसेशी एकमत होऊ शकत नाही. त्यामुळे युतीबद्दल अजून तरी विषय आलेला नाही, असेही पाटील यांनी सांगितले.