मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या आरोग्याच्या हिताचा आणि इतर परिणामांचा विचार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर वरिष्ठ मंडळींशी चर्चा करून राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत ठरवतील. मुख्यमंत्र्यांनाच लॉकडाउनचा अधिकार असतो. लॉकडाउन हा तर शेवटचाच पर्याय असतो. त्यामुळे याबाबत सविस्तर चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

टोपे म्हणाले की, राज्यातील नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचे गांभीर्याने पालन करावे, अन्यथा लॉकडाउनचा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नसेल. आणखी दोन ते तीन दिवस पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांतील रुग्णवाढीची दिशा पाहून योग्य ते निर्णय घेतले जातील. मुंबईतील लोकलबाबत सुरेश काकाणी यांनी चर्चा करुन पत्र काढले आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांनी योग्य प्रतिसाद दिला नाही, तर रेल्वेच्या बाबतीत योग्य ते विचार करावा लागेल, असे सांगितले आहे. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेतील, असेही टोपे यांनी यावेळी सांगितले.