कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही, मास्क नाही सेवा नाही’ हा अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचा गौरव केला. पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ प्रणालीद्वारे संवाद साधला.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रभारी पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. उज्ज्वला माने, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम लोकचळवळ व्हावी. यातून महाराष्ट्र आरोग्य संपन्न होण्यासाठी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखण्यासाठी नागरिकांमध्ये प्रभावीपणे जनजागृती होणे गरजचे आहे. मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही असा अभिनव उपक्रम कोल्हापूरने सुरु केला आहे. हा उपक्रम कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे हा उपक्रम राज्यभर राबवायला हवे.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या नजिकच्या जिल्ह्यासह सीमा भागातून उपचारासाठी रुग्ण येत आहेत. त्यामुळे फिजिशिएन उपलब्ध व्हावेत. एनआयव्ही, एचएफएन खाटांची क्षमता वाढवून ठेवावी लागेल. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून आवश्यक असणारा एसडीआरएफमधील निधी मिळावा.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, व्यापारी, दुकानदारांत मोहिमेच्या प्रचारासाठी स्टिकर्स लावले जात आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य हे आपल्या गावांमध्ये, प्रभागांमध्ये प्रबोधनाचे होर्डिग्ज लावत आहेत. दुकानदार दर्शनी भागात मोठ्या प्रमाणात फलक लावत आहेत. घंटा गाडीवरुनही मोठ्या प्रमाणात मोहिमेची प्रचार प्रसिध्दी केली जात आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी विना मास्क खरेदी करु नये तसेच संबंधित दुकानदारानेही मास्क् न लावल्यास त्याच्याकडूनही ग्राहकांनी खरेदी करु नये यासाठी मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तू नाही असे फलक दुकानदार दर्शनी बाजूस स्वत:हून लावत असल्याचे सांगितले.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, दुकानदाराने मास्क वापरला नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. जी दुकाने या नियमांचे पालन करीत नाहीत ती दुकाने आठ दिवसांसाठी सील करण्यात येत आहेत.

या व्हिडिओ कॉन्फरन्सला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,  गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे पालकसचिव सहभागी झाले होते.