मुंबई (प्रतिनिधी) : तुमच्यात जर हिंमत असेल, तर तुम्हाला जे तुमचे खरे इतिहास अभ्यासक, संशोधक वाटतात त्यांना तुम्ही बोलवा आम्ही आमचे अभ्यासक आणि संशोधक बोलवून एक चर्चा सत्र घडवू. आम्ही निश्चित सांगू शकतो की तुम्हाला सत्य इतिहासाचं दर्शन घडवू शकतो. तुम्हाला जे संदर्भ हवे आहेत ते सत्य आणि ऐतिहासिक संदर्भ देऊन आम्ही इतिहास मांडू. तुम्ही हिंमत दाखवा आणि चर्चासत्र बोलवा, असे थेट आव्हान संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे.

आखरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत. मात्र संभाजी ब्रिगेड ही वैचारिक वारसदार आहे. वायफळ चर्चा आणि उगाच जिभेला आले, असे बोलून उगाच महाराष्ट्राला वेठीस धरु नका. महाराष्ट्र पुरोगामी असून महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आहे. तिचे जतन करण्याचे काम आजपर्यंत आम्ही केले आहे. असे सांगून राज यांना चर्चेचं निमंत्रण देऊन आम्ही खरा इतिहास समोर आणून दाखवू, असा दावाही आखरे यांनी केला आहे.