मुंबई (प्रतिनिधी) : मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो आहे, तेव्हापासून माझं सरकार पाडण्याच्या विविध तारखांबाबत मी ऐकत आहे. मात्र, ते अद्यापही घडलेले नाही. जर तुमच्यात हिंमत असेल, तर माझं सरकार पाडा, असे थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. रविवारी झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.  

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, देश महामारीच्या संकटात असताना केंद्र सरकारचे लक्ष बिगर भाजपा राज्यातील सरकारे पाडण्याकडे आहे. त्यामुळे देश सध्या अराजकतेच्या दिशेने चालला आहे. आपल्या या वृत्तीमुळे भाजपा सहकाऱ्यांना गमावत आहे. आता तर एनडीएही संपली आहे. भाजप मैत्रीची भाषा करून त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसते. बिहारच्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजप  नितिशकुमार यांनाही अशीच वागणूक देईल, असे ठाकरे म्हणाले.

तुमचे हिंदुत्व थाळ्या-घंटा बडवणारं असेल पण शिवसेनेचं हिंदुत्व हे दहशतवाद्यांना बडवणार आहे, असेही त्यांनी मंदिर उघडण्यावरून भाजपवर निशाणा साधला.   कंगना राणावतचा मुद्दा, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या यावरून महाराष्ट्राची बदनामी करणारे या मातीशी बेईमानी करणारे असून तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या केल्यात. आता ते गिळा व ढेकर देऊन गप्प बसा, अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले.