कागल (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप म्हणजे घाणेरडे राजकारण आणि निव्वळ स्टंटबाजी आहे. हिंमत असेल तर किरीट सोमय्या यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज (शुक्रवार) दिले.
सोमवारी (दि.२०) सोमय्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्ही जनता, कार्यकर्ते, सरसेनापती साखर कारखान्याचे सभासद शेतकरी, हजारो निराधार माता-भगिनी आणि पेशंट कागलमध्ये एकत्र येणार आहोत. आम्हाला भेटूनच त्यांनी पुढे जावे, असेही आव्हान यावेळी देण्यात आले.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले की, सोमय्या यांच्या सर्व प्रश्नांची माहिती सविस्तर देऊ, असे निवेदन मंत्री मुश्रीफ यांनी केले होते. असे असतानाही कोल्हापूर दौरा, कागल आणि कारखाना ही स्टंटबाजी कशासाठी ? सोमवारी सकाळी १० वाजता कागलमध्ये छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्ही २५ ते ३० हजारांहून अधिक जण एकत्र येणार आहोत. यावेळी आमच्या प्रश्नांची उत्तरे देऊनच सोमय्यांनी पुढे जावे.
बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले म्हणाले की, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी घरातील सोने तारण ठेवून सभासदत्व घेतले आहे. बिनबुडाचे व सनसनाटी आरोप, वक्तव्ये करुन स्टंटबाजी करायची, हा किरीट सोमय्या यांचा छंदच आहे. कदाचित, किरीट सोमय्या यांचा हा शेवटचा स्टंट ठरेल. कारण, त्यांनी कोल्हापूरच्या लाल मातीतील हसन मुश्रीफ या रांगड्या पैलवानाशी पंगा घेतलेला आहे.
बाचणीचे माजी सरपंच सूर्यकांत पाटील म्हणाले, किरीट सोमय्या हे भाजपचे नेते नसून पक्ष संघटनेवर वाढलेले बांडगुळ आहे.
माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, योद्धा हरत नाही, त्यावेळी त्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जाते. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर रचलेले हे षडयंत्र मोडून काढूया आणि जनतेची ताकद दाखवूया.
प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्या या षड्यंत्रात चंद्रकांत पाटीलही पडद्याआडून सामील आहेत. या दोघांनीही कागलच्या जनतेचे स्वागत स्वीकरुनच मग पुढे जावे, असे उपरोधिक आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचा सन्मान करणारा आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कल्याणकारी योजना राबवणारा हा कारखाना आहे. या श्रममंदिरावर केलेली चिखलफेक खपवून घेतली जाणार नाही.
यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश माळी, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, प्रवीण काळबर, शशिकांत खोत, शिवानंद माळी, बच्चन कांबळे, रणजीत बन्ने, आनंदराव पसारे, बाबासो नाईक, सागर गुरव, संग्राम गुरव, देवानंद पाटील, नवल बोते, सतीश घाडगे, पंकज खलिफ आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी स्वागत केले. कागल पंचायत समितीचे सभापती रमेश तोडकर यांनी आभार मानले.