मुंबई (प्रतिनिधी) : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. दरम्यान, देशमुख यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणी त्वरित चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आलेल्या पत्राचा फोटोही ट्विटमध्ये जोडला आहे.

या ट्विट देशमुख यांनी म्हटले आहे की, मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते. 

दरम्यान, परमबीर सिंग यांच्या आरोपांवरुन राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारत उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.